Monday, 18 April 2016

भगोरिया उत्सवाच्या अनेक छटा

भगोरिया उत्सवाच्या अनेक टा



भगोरिया किवां स्थानिक भाषेत भूगोरिया दर वर्षी होळीच्या एक आठवळ्या पूर्वी सहा दिवसा साठी मध्य प्रदेशच्या अलिराजपूर जिल्हात साजरा केला जातो. प्रत्येक दिवशी जिल्हातील एका गावात भगोरियाचे आयोजन भिल, भिलाला, पटलीया व अन्य आदिवासी प्रजाती करतात. इथली जमीन उपजाऊ नाही, शेती जवळ पास नावा पुरतीच आणि मागास क्षेत्र असल्यामुळे गावात फारसे काम सुद्धा नाही. ताडी गोळा करून विकणे हाच इकळचा सर्वात मोठा व्यवसाय. लोकं गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र सारख्या राज्यात जाऊन मजूरी करतात. होळीच्या महिन्यात ते आपल्या गावात पीक कापण्या साठी मदतीला परत येतात. भगोरिया उत्सव त्यांची घर परतणी, पीक कापणी आणि लग्नाचा महूर्त साजरा करणारा आनंदाचा मेळावा असतो.


माझे भगोरिया आदिवासी उत्सवात जाण्याचे ठरले आणि मी नेटवर त्याच्या बद्दल माहिती गोळा करू लागली. नेटवर भगोरिया बद्दल माहिती वाचल्यावर माझी या आदिवासी उत्सवाला भेट देण्याची उत्सुकता अजून वाढली. नागपुरहुन रेलचा प्रवास करून आम्ही सकाळी सहाच्या सुमारास इंदूर पोचलो. तिथून पाच तासाच्या प्रवासानंतर सोंडवा आणि वालपूर गावाच्या मध्ये स्थित मध्य प्रदेश पर्यटनाच्या कैम्प साईट वर पोहोचलो. कैम्प साईट मधे भरपूर टेंट लागले होते, टेंट मधे राहण्याची माझी पहिलीच वेळ असल्यामुळे माझा आनंद दुप्पट झाला.
जेवण करून आम्ही लगेच सोंडवा गावाकडे निघालो. सोनडवा गावात त्या दिवशी भगोरियाचे आयोजन होते. आमच्या ड्राइव्हर आणि एस्कॉर्टनी भगोरिया बद्दल बरीच माहिती दिल्या मुळे केव्हां प्रत्यक्ष भगोरिया उत्सव पहायला मिळतं असे झाले होते. कैमेरा हातात घेऊन मेळ्याच्या आत शिरलो. आत शिरताच जिथे नजर पडेल इथे रंगच रंग पसरले होते. रंगी बेरंगी सुंदर पारंपारिक कपडे घालून बायका, मुले आणि माणसं वावरत होती. लहंगा, नाजूक कलाकरी केलेल्या ओढण्या आणि खाल पासून वर पर्यंत जड चांदीचे दागिने घालून मुली व बायका सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होते. हातात घातलेला   ‘हात फूल’, गळ्यात जड चांदीची माळ, कमरेत सुंदर कामरपट्टा आणि रंगी बेरंगी झुमरे घातलेल्या मुलींना पाहून मन प्रसन्न झाले. तरुण मुलं रंगीत चष्मा आणि रंगी बेरंगी कपडे घालून तरुणींचे लक्ष आकर्षित करण्याच्या प्रयत्नात होते.


गावात भरलेला भगोरिया इथल्या लोकांसाठी मनोरंजनाचा एकमेव ठिकाण. आईसक्रीम, पान, भाज्या, फळ, खाद्य पदार्थ तसेच बांगडया, कपडे, चांदीचे दागिने, बायकांचे सौंदर्य प्रसाधन याचे दूकान दिसले. रताळे आणि पत्ता कोबी सोडून दुसरी भाजी दिसली नाही. आदिवासी हस्तकला आणि हस्तकले नी बनविलेल्या बांबूच्या वस्तु विकायला होत्या. पायात घुंगरू घालून माणसं ढोल आणि पुंगीच्या तालावर सकाळ पासून संध्या काळ ताडी पिऊन पर्यंत नाचत होती.  हातावर तैटू करून घेताना, वेग वेगळया झुल्यांचा आनंद घेताना मुले व बायका आढळल्या. मेळ्यात फिरताना त्यांचा हा आगळा वेगळा जग पाहायला आणि अनुभव करायला मिळाला आणि या सर्व श्रणांना आम्ही कैमेरेत कैद केल्या. आदिवासींची अशी रंगीन दुनिया पाहून भगोरियाच्या प्रेमात पडलं नाही असा एक ही माणूस मला तिथे दिसला नाही.



        
आदिवासी प्रथेनुसार त्यांच्या तरुणांना लग्नासाठी आपल्या पसंतीचा जोडीदार निवडायचा हक्क असतो. साप्ताहिक बाजार त्यांचे भेटण्याचे उत्तम स्थान, अनेक प्रेम कथा येथे बाजारात फुलल्या. एखाद्या मुलाला कोणती मुलगी आवडत असली तर भगोरियाचा फायदा घेऊन तो तिच्या चेहऱ्यावर गुलाल लाऊन लग्नाचा प्रस्ताव ठेवतो, मुलीला प्रस्ताव मान्य असलं तर ती त्याच्या चेहऱ्यावर गुलाल लाऊन आणि त्यांनी दिलेला पान खाऊन लग्नाचा प्रस्ताव स्वीकार करते. दोघांच्या होकारा नंतर त्यांचे घरचे लोकं पुढची बोलणी करतात किवां मुलगा होणाऱ्या बायकोला आपल्या घरी पडून नेतो. पडून घरी आणलेल्या मुलीला मुलाचे घरचे लोकं आनंदात स्वीकारतात. भगोरिया उत्सव आणि लग्नाच्या तिथी मधे काही दिवस असल्या मुळे या कालावधीत, मुलीच्या घरच्यांची लग्नासाठी सहमती घेतली जाते आणि सगळ्यांच्या सहमतीने लग्न पार पडतं. लग्नाला मुलीच्या वडीलांचा नकार असला तर अशा वेळेस लग्न मुलाच्या घरीच लावला जातो. दोन्ही परिस्तीठीत लग्नाचा खर्च मुलाला करावा लागतो. लग्नाच्या शेवटच्या श्रणा पर्यंत मात्र मुलगी लग्नाला नकार देऊ शकते आणि  आपल्या आई वडीलां कडे परत जाऊ शकते ही स्वतंत्रता आदिवासी समाजाने मुलीला दिले आहे आणि याचा वापर मुली करतात हे महत्वाचं. आदिवासी आपल्या पेक्षा विचारात किती तरी पुढे आहेत असे वाटायला लागले.
सूर्य मावळला आणि सोंडवाचा भगोरिया संपला. दुसऱ्या दिवशी वालपूर गावात भगोरिया भरणार होता. वालपूरचा मेळा सोंडवा पेक्षा मोठा आणि पारंपारिक दिसला. या मेळ्यात देश विदेशातून अनेक पर्यटक आदिवासी कला आणि संस्कृती बघायला सामिल झाले होते. सगळ्यांची फोटो काढण्याची तडजोड चालू होती.


भगोरिया बद्दल अधिक माहिती मिळवण्या करिता संध्याकाळी मेळा संपल्या नंतर आम्ही वालपूरच्या सरपंच हजारी बाई खरत आणि त्यांचा मुलगा जयदीप सिंग, पूर्व सरपंच यांच्याशी भेट घातली. भगोरिया हून पडून जाऊन लग्न करायची पद्धत अजूनही प्रचलित असली तरी बदलत्या काळा प्रमाणे शिक्षणाचे महत्व तरुण पिढीला पटल्या मुळे आता पूर्ण शिक्षण झाल्या नंतरच लग्न करतात, शिक्षणात मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असून, शिकलेली आणि नोकरी करणारी सून मिळावी अशी पसंती झाली आहे असे त्यांनी सांगितले. शिक्षण मध्येच सोडणे आणि व्यसन या गंभीर समस्या इकळच्या तरूणां मधे आहे असे ते पुढे म्हणाले. गावात रोजगार वाढवण्या करिता तरुणांसाठी शासनाच्या सहकार्याने कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केल्यावर गावात रोजगार निर्माण होईल अशी त्यांची अपेक्षा आहे.

भगोरिया बद्द्ल माहिती दिल्याचे आभार माणून आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि कैम्प मधे ठेवण्यास आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात्र सामिल झालो. कार्यक्रमाचा आनंद जिल्हातले वरिष्ठ अधिकारी, त्यांचा परिवार आणि जवळच्या गावातले बरेच आदिवासी लोकांनी घेतला. इथली संस्कृती, इथले विचार आणि लोकांच्या स्वभावातला सादे पणा ने आमचे मण जिंकून घेतले आणि पुढच्या वर्षी पुन्हा परत येऊ असे मनात नक्की करून आम्ही भगोरियाचा निरोप घेतला. 

1 comment: